What we do

गाव तिथे गोशाळा

मुळशी तालुक्यातील जामगांव याठिकाणी विश्वकर्मा सेवा फाऊंडेशन गेली नऊ वर्षे विविध विधायक प्रकल्प, उपक्रम आणि कार्यक्रम राबवत आहे. निर्मलाग्राम, गोबरगॅस प्रकल्प, सौरउर्जा प्रकल्प, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, गोशाळा असे विविध प्रकल्प फाऊंडेशनने राबवलेले आहेत.
फाऊंडेशनने ग्रामस्थांच्या सहकार्याने गावांत १२३ स्वच्छतागृहे बांधून दिली आणि जामगांव हे मुळशी तालुक्यातील पहिले निर्मलग्राम ठरले. नैसर्गिक स्त्रोतांचा स्थानिक ठिकाणी योग्य वापर आणि पर्यावरणाचे रक्षण या हेतूने गावातील अनेक घरांमध्ये फाऊंडेशनने गोबर गॅस प्रकल्प उभारले आहेत. टाटा पॉवरच्या सहकार्याने सौर उर्जा प्रकल्पही सुरू करण्यात आलेला आहे. याखेरीज शेतकऱ्यांना शेतीपूरक विविध योजनांची, व्यवसायांची, तंत्रज्ञानाची माहिती होण्याच्यादृष्टीने फाऊंडेशनतर्फे कार्यशाळा घेण्यात येतात. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन आणि गावातील शेतीला शेणखत उपलब्ध व्हावे, या हेतूने फाऊंडेशनने २०० गाईंच्या कपिला गोशाळेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे आठ लाख रुपये खर्च करून फाऊंडेशनने सर्व सुविधांनीयुक्त असा गोठा बांधला आहे. २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर कपिला गोशाळेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात गोशाळेचा विस्तार करून गाईंची संख्या २०० पर्यंत नेण्याची फाऊंडेशनची योजना आहे. या सगळ्यातून परिसरातील शेतकऱ्यांसाठी दर्जेदार शेणखत व इतर उत्पादने तयार करणे, गो-रक्षण, तसेच गावासाठी एकत्रित गोबर गॅस प्रकल्प उभारण्याची फाऊंडेशनची योजना आहे.
समृद्ध शेतकरी, विकसित गावे, संपन्न राष्ट्र या संकल्पनेतून फाऊंडेशन ग्रामविकास, सेंद्रीय शेती, पर्यावरण व गोरक्षण यासाठी कार्यरत आहे. आपणही या कार्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सहभागी व्हावे. या कामासाठी आपण आर्थिक मदतही करू शकता. सोबत बँक खात्याची माहिती दिलेली आहे. देणगीवर प्राप्तीकर कलम ८० जी अंतर्गत प्राप्तीकरातून सवलत मिळते.